
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, १९६ आंबेगाव विधानसभा मतदार संघामध्ये ‘विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) २०२६’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेंतर्गत सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या बूथ लेव्हल एजंट्सची (BLA) विशेष आढावा बैठक आणि तांत्रिक प्रशिक्षण शिबीर उत्साहात पार पडले. सदर बैठक १ जुलै २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता अवसरी खुर्द येथील ‘कवयित्री शांता शेळके सभागृह’ येथे मतदार नोंदणी अधिकारी तथा उप जिल्हाधिकारी श्रीमती अर्चना तांबे यांच्या अध्यक्षतेखाली यशस्वीरित्या संपन्न झाली.
प्रतिनिधी – दिपाली खिरड
बैठकीची प्रमुख वैशिष्ट्ये आणि उपस्थिती
या महत्त्वाच्या बैठकीला मतदारसंघातील विविध राजकीय पक्षांचे एकूण ९६ बूथ लेव्हल एजंट (BLA) आणि २३ प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी मतदार नोंदणी अधिकारी श्रीमती अर्चना तांबे, तहसीलदार (विशेष सखोल पुनरीक्षण) श्री. राहुल सारंग आणि प्रभारी तहसीलदार डॉ. सचिन वाघ यांनी उपस्थित सर्व एजंट्सना त्यांच्या कर्तव्य व कामकाजाविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
प्रशिक्षण व बैठकीतील मुख्य मुद्दे
- पुनरीक्षण आराखडा : निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार कार्यक्रमाचे वेळापत्रक आणि उद्दिष्टे स्पष्ट करण्यात आली.
- मतदारसंघाची सांख्यिकी : एकूण मतदान केंद्रे, नियुक्त BLO, पर्यवेक्षक आणि सद्यस्थितीतील मतदारांच्या आकडेवारीची माहिती देण्यात आली.
- घरोघरी पडताळणी मोहीम : मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत (BLO) सुरू असलेल्या गणना पत्रक (Enumeration Form) वाटपाचा आढावा घेण्यात आला.
- BLO – BLA समन्वय : मतदार यादी अचूक करण्यासाठी राजकीय पक्षांच्या एजंट्सनी BLO ला पूर्ण सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.
- ASDD मतदारांवर कारवाई : गैरहजर (Absent), स्थलांतरित (Shifted), दुबार (Duplicate) आणि मृत (Dead) मतदारांची नावे शोधून पुढील कायदेशीर कारवाई करण्यावर चर्चा झाली.
- दावे व अंतिम यादी: आगामी काळातील प्रारूप मसुदा यादी, त्यावर मागवण्यात येणारे दावे – हरकती आणि पारदर्शक पद्धतीने प्रसिद्ध होणाऱ्या अंतिम मतदार यादीच्या वेळापत्रकाची माहिती देण्यात आली.

अधिकारी संदेश
बैठकीचा समारोप करताना मतदार नोंदणी अधिकारी श्रीमती अर्चना तांबे म्हणाल्या की, “या मोहिमेचा मुख्य उद्देश एकही पात्र मतदार नोंदणीपासून वंचित राहू नये आणि एकही अपात्र व्यक्तीचा समावेश मतदार यादीत होऊ नये हा आहे.” त्यांनी सर्व राजकीय पक्षांना प्रशासनाशी समन्वय साधून अत्यंत स्वच्छ, पारदर्शक आणि त्रुटीरहित मतदार यादी तयार करण्यासाठी सक्रिय सहभाग नोंदवण्याचे कळकळीचे आवाहन केले.




