
प्रतिनिधी – पारगाव
याबाबत मिळालेली माहिती अशी की, मौजे धुमाळस्थळ खडकवाडी ता. आंबेगाव जि पुणे येथील शेतकरी संदीप बबन धुमाळ यांचे शेत जमिन गट नं 1036 मध्ये शेतकऱ्याने कांदा साठवण्यासाठी लाकडाची व बाजरीच्या सरमाडीची बराखी चाळ बनवली होती.
सध्या शेतकऱ्याच्या मालाला चांगला भाव नसल्यामुळे त्याच बरोबर पावसाचे वातावरण असल्यामुळे शेतकरी संदीप धुमाळ यांनी सदर बराखीमध्ये अंदाजे 250 पिशव्या भरतील इतका कांदा साठवून ठेवला होता.
मात्र शुक्रवार दिनांक 30/05/2025 रोजी कोणीतरी अज्ञात व्यक्तीने धुमाळ यांचे नुकसान करण्याच्या उद्देशाने सदर कांद्याचे बराखीवर पेट्रोल टाकून आग लावुन मोठे नुकसान केले आहे. सदर आग लागल्याचे शेजारील शेतकरी अतुल धुमाळ,अजय धुमाळ, मच्छिंद्र धुमाळ यांनी पाहिले. अचानक बराखितून धूर निघत असताना शेतकरी संदीप धुमाळ यांना कळविले की तुमची बराखी कोणीतरी पेटवून दिलेली आहे. मात्र तेथील सर्वांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. या लावलेल्या आगीत अंदाजे 250 कांद्याच्या पिशव्या जळुन गेल्या असून शेतकऱ्याचे आजच्या बाजार भावानुसार अंदाजे 2,00,000/- रू चे नुकसान झाले आहे. या बाबतची तक्रार फिर्यादी संदीप बबन धुमाळ यांनी पारगाव (कारखाना) पोलीस स्टेशनाला दिली आहे. सदर पोलीस स्टेशन यांनी भा. न्याय. संहिता कलम 326 (एफ) प्रमाणे अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पारगाव (कारखाना) पोलीस स्टेशन येथील स.पो. नि नेताजी गंधारे यांचे मार्गदर्शनाखाली पो. हवा. कालेकर हे करत आहेत.
दरम्यान घडलेल्या घटनेबाबत शेतकरी व त्यांचे भाऊ यांनी बराखीला आग लावलेल्या अज्ञात व्यक्तीला लवकरात लवकर शोध घेऊन त्याच्यावर कठोर स्वरूपाची कारवाई करण्याची मागणी शेतकरी कुटुंबीय यांनी केली आहे. तसेच सदर घडलेल्या घटनेबाबत शासनाने मदत करण्याचे आव्हान शेतकरी यांनी केले आहे.