
मंचर/पुणे प्रतिनिधी – दिपाली खिरड
हवामान विभागाने आज, १९ मार्च २०२६ रोजी पुणे जिल्ह्यासाठी ‘येलो अलर्ट’ जाहीर केला असून पुढील तीन तासांत जिल्ह्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आंबेगाव तहसील कार्यालयाने तालुक्यातील नागरिकांना, विशेषतः नदीकाठच्या रहिवाशांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील काही तासांत पुणे जिल्ह्यात ठिकठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळू शकतात. यावेळी ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने सोसाट्याचे वारे वाहण्याची दाट शक्यता आहे.

प्रशासनाचे आवाहन:
आंबेगावचे तहसीलदार सचिन वाघ यांनी तालुक्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देताना सांगितले की, “नदीकाठच्या सखल भागात राहणाऱ्या नागरिकांनी सुरक्षित स्थळी आश्रय घ्यावा. सखल भागात जाणे टाळावे तसेच पावसामुळे नुकसान टाळण्यासाठी आपले धान्य व इतर महत्त्वाच्या वस्तू तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवाव्यात.”
शेतकऱ्यांनी आपल्या शेतमालाची योग्य काळजी घ्यावी आणि विजा चमकत असताना झाडाखाली किंवा मोकळ्या जागेत थांबणे टाळावे, अशा सूचनाही प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.


